“भारतातील विद्यापीठांनी ‘स्वावलंबनाचे मॉडेल‘ उभे केल्यास खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळ मिळेल.” – डॉ. अतुल कोठारी (राष्ट्रीय सचिव, शिक्षण संस्कृती उत्थान न्यास)
‘पुणे, : पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने (अभिमत विद्यापीठ) आयोजित केलेली ‘भारतीय विद्यापीठ संघाची (AIU) ऐतिहासिक १०० वी वार्षिक महासभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद आज उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाली. भारतीय उच्च शिक्षणाच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.या तीन दिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक महाकुंभात देशभरातील कुलगुरू, धोरणकर्ते, शिक्षण क्षेत्रातील दिग्गज आणि तज्ज्ञ एकत्र आले होते. “विकसित भारत २०४७” या व्यापक संकल्पनेखाली भारतीय उच्च शिक्षणाचे भवितव्य आणि त्यापुढील दिशा यावर या परिषदेत सखोल मंथन करण्यात आले.
या सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अतुल कोठारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे, भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्ष – मा. प्रा. विनय कुमार पाठक, सरचिटणीस आणि सदस्य सचिव – डॉ. सौ. पंकज मित्तल उपस्थित होते.
यावेळी मा. डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे, मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे, मा. डॉ. सौ. स्मिता जाधव, प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे, मा. डॉ. यशराज पी. पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून पाहुण्यांचे स्वागत केले याचबरोबर देशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञचे आभार व्यक्त केले.
मा. डॉ. अतुल कोठारी (राष्ट्रीय सचिव, शिक्षण संस्कृती उत्थान न्यास) म्हणाले की, “या तीन दिवसीय परिषदेने आपणा सर्वांना एक समृद्ध वैचारिक शिदोरी दिली आहे; मात्र मिळालेले हे ज्ञान केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता, ते आपल्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात रुजवणे अधिक महत्त्वाचे आहे. सर्व विद्यापीठांनी आधुनिकतेची कास धरतानाच भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन करून ‘आत्मनिर्भर भारत‘ घडवण्यासाठी योगदान देणे काळाची गरज आहे.
आपण विकासात्मक परिवर्तनाचे नेहमीच स्वागत केले आहे; परंतु हे परिवर्तन घडवून आणताना पर्यावरण रक्षण, मानवी मूल्ये आणि सार्वजनिक आरोग्य यांचा गांभीर्याने विचार करणे अनिवार्य आहे. समाजाला सकारात्मक आणि मूल्याधिष्ठित ज्ञान देणे ही विद्यापीठांची आद्य जबाबदारी आहे. आजच्या युगात प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करत असताना, त्याचा होणारा संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक ते ‘ज्ञानवर्धन‘ आणि जाणीवजागृती करणेही तितकेच गरजेचे आहे.
स्वावलंबनाचे मॉडेल‘ उभे केल्यास खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळ मिळेल. विकसित भारत‘च्या संकल्पनेअंतर्गत स्पष्ट उद्दिष्टे देण्याची गरज आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परावलंबित्वाकडून स्वावलंबनाकडे नेण्यास प्रोत्साहन मिळेल. जोपर्यंत आपली शिक्षण व्यवस्था स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण खरी ‘आत्मनिर्भरता‘ साध्य करू शकत नाही. दुर्दैवाने, आजही आपले अनेक अभ्यासक्रम भारताबाहेरून प्रभावित किंवा घेतलेले असतात, हे बदललेच पाहिजे. आपल्या संस्था आणि आपले विद्यार्थी हे विचार, रचना (Design) आणि अंमलबजावणीमध्ये स्वावलंबी होणे हेच आपले ध्येय असावे.
भारतीय परंपरेवर आधारित ज्ञानसाधनेचा वारसा पुढे नेत, प्रत्येक विद्यापीठाने एका विशिष्ट विषयावर सखोल संशोधन व कार्य करण्याचा निर्धार करायला हवा. विद्यापीठांनी ‘स्वदेशी‘चा विचार केवळ संकल्पनेपुरता मर्यादित न ठेवता, तो दैनंदिन व्यवहारात आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. यामध्ये प्रादेशिक भाषांचे जतन, भारतीय पेहरा,व खानपान, संस्कृती आणि मूल्यांचा सन्मान करणाऱ्या उपक्रमांचा समावेश असावा.
आपल्याला वैद्यकीय शिक्षणासह सर्व विद्याशाखांमध्ये एकत्रितपणे काम करावे लागेल, जिथे अधिक सर्वांगीण दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. शिक्षणाचा उद्देश समस्यांवर वारंवार चर्चा करणे हा नसून सक्रियपणे उपाय शोधणे हा आहे. राष्ट्रासमोर असलेल्या प्रत्येक आव्हानाकडे नवोपक्रम आणि प्रगतीची संधी म्हणून पाहिले पाहिजे. जर आपण आव्हानांचे संधीत रूपांतर करू शकलो, तरच आपण खऱ्या अर्थाने ‘विकसित भारत‘ची भावना आणि मानवी प्रगतीचे व्यापक ध्येय पूर्ण करू शकू.”
मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे म्हणाले की, “भारतीय विद्यापीठ संघाचे (AIU) हे १०० वे संमेलन म्हणजे भारतातील उच्च शिक्षणासाठी आत्मचिंतन आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण आहे. आपण जेव्हा ‘विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, २०२५‘ वर चर्चा करत आहोत, तेव्हा शैक्षणिक दर्जा उंचावणारी, नवोन्मेषाला (Innovation) चालना देणारी आणि सर्वांसाठी समावेशक संधी सुनिश्चित करणारी चौकट उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण संस्थांनी भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज, जागतिक स्तरावर सुसंगत आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी जोडलेली परिसंस्था (Ecosystem) निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे.”
मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुढे म्हणाल्या की, “हे ऐतिहासिक व्यासपीठ वेगाने बदलणाऱ्या जगात शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी शैक्षणिक धोरणांना एकत्र आणते. आपले लक्ष प्रामुख्याने गुणवत्ता, आंतरविद्याशाखीय शिक्षण (Interdisciplinary learning) आणि समाजाच्या खऱ्या गरजांना प्रतिसाद देणाऱ्या अर्थपूर्ण संशोधनावर असले पाहिजे. संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत करणे आणि बदलत्या जागतिक व राष्ट्रीय मागण्यांनुसार शिक्षणाची सांगड घालणे, हेच एक प्रगत आणि जबाबदार उच्च शिक्षण प्रणाली उभारण्यासाठी कळीचे ठरेल.”


