पुणे | प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले
महाराष्ट्र श्रम कामगार संघटना यांच्या वतीने रविवार दि. १७ मे २०२६ रोजी आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात लेखक संदीप राक्षे यांना “जगदगुरू तुकोबाराय साहित्य पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच अभिनेते नितीश घारे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साहित्य, समाजप्रबोधन आणि माणुसकीच्या मूल्यांना शब्दरूप देणाऱ्या संदीप राक्षे यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. प्रवासवर्णन, कथा, पर्यावरण, अध्यात्म, शिक्षण आणि सामाजिक जाणिवा या विषयांवर प्रभावी लेखन करून संदीप राक्षे यांनी वाचकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगदगुरू संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाला लाभलेले अनमोल रत्न मानले जातात. “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” ही ओळ महाराष्ट्राच्या भक्ती, अध्यात्म आणि साहित्य परंपरेचा आत्मा मानली जाते. अशा संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे साहित्य क्षेत्रातील मोठा सन्मान मानला जातो. पुरस्कार स्वीकारताना संदीप राक्षे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नसून शब्दांना लाभलेलं वारकरी संस्कारांचं पावित्र्य आहे. समाजमन जागं ठेवण्याचा आणि माणुसकीचा संदेश साहित्याद्वारे पोहोचवण्याचा माझा प्रयत्न यामुळे अधिक बळकट झाला आहे.
लेखक संदीप राक्षे यांना जगदगुरू तुकोबाराय साहित्य पुरस्कार प्रदान..


